
ठाणे; विशेष प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी परिसरात भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करत दुकाने मांडल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
या बाजारामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहनांची लांबलचक रांग लागत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना तसेच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या ठिकाणी पोलीस व महापालिका प्रशासनाकडून योग्य नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


