
ठाणे : निलेश पांडुरंग घाग
यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी असेल. IRCTC वरून जास्तीत जास्त साठ दिवस आधी रेल्वेचे ऑनलाईन रिझर्व्हेशन करता येते. यामुळे ११ सप्टेंबरसाठीचे ऑनलाईन रिझर्व्हेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळातील गाड्या फुल होण्याची गॅरेंटी असल्यामुळेच कोकण रेल्वे विशेष गाड्यांच्या नियोजनाची तयार करत असल्याचे समजते.
भारतीय रेल्वेच्या आगाऊ आरक्षण नियमांनुसार सप्टेंबरमधील प्रवासासाठी तिकीट बुकिंग जुलै महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छित तारखेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांनी आरक्षणाच्या तारखांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यंदा १७ सप्टेंबरला गौरी आगमन आणि १८ सप्टेंबरला गौरी पूजन होणार असल्याने या कालावधीतही कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसांसाठीही रेल्वे तिकिटांची मोठी मागणी असू शकते.
दरवर्षी नियमित गाड्यांमधील तिकिटे काही मिनिटांत संपत असल्याने अनेक प्रवाशांना विशेष गणपती स्पेशल गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. यंदाही रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

जाहिरात


