
नवी मुंबई: भंगार विक्रीच्या व्यवसायाआडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नेरूळ परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) ही धडक कारवाई केली.
पोलिसांनी या कारवाईत तब्बल २२ लाख रुपये किमतीची हिरोईन आणि गांजा जप्त केला आहे. नेरूळ सेक्टर-२८ मधील रेल्वे रुळांलगत असलेल्या एका झोपडीतून हा काळाबाजार सुरू होता. कुख्यात ‘राठोड’ गँग अटकेत: याप्रकरणी राठोड कुटुंबातील ७ सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजू राठोड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यावर यापूर्वीही मारामारी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो आता पोलिसांच्या कोठडीत आहे.



