
ठाणे ; निलेश घाग
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. १५ जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता ती तारीखही उलटली असली तरी अजून मान्सूनची प्रगती संथ गतीनेच सुरू आहे. त्यात आता ठाणेकरांसमोर पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे.
- एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर ९ जून २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून २०% पाणीकपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवार १८ जून रोजी दुपारी १२;०० वाजल्यापासून ते शुक्रवार १९ जून रोजी दुपारी १२;०० वाजेपर्यंत एकूण २४ तास बंद राहणार आहे.
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपर्ण बंद राहील. तसेच, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.

जाहिरात



