
मुंबई : प्रतिनिधी
दैनंदिन व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा आता अधिक सुरक्षित आणि मजबूत होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या दोन्ही चलनांच्या सुरक्षा मानकांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट नोटांना लगाम घालण्यासाठी आणि नोटांचे आयुष्य वाढवण्यासाठी ही नवीन मालिका लवकरच बाजारात येईल. मात्र, यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – जुन्या नोटांचे काय होणार?
का घेतला हा निर्णय ?
डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असले, तरी ग्रामीण भाग, वाहतूक क्षेत्र आणि किरकोळ बाजारात आजही रोखीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. १०० आणि ५०० च्या नोटांची बनावट आवृत्ती तयार करणे कठीण जावे, यासाठी वॉटरमार्क आणि सूक्ष्म छपाईमध्ये बदल करण्यात आले आहेत. नोटा वारंवार हाताळल्यामुळे किंवा दुमडल्यामुळे खराब होतात. नवीन नोटांची शाई आणि कागदाचा दर्जा सुधारल्यामुळे त्या अधिक काळ टिकतील.
१०० रुपयांच्या नोटेत काय बदलणार ?
१०० रुपयांच्या नोटेचा मूळ आराखडा तोच राहिला असला तरी तांत्रिक बदल लक्षणीय आहेत. नोटेची छपाई अधिक स्पष्ट असेल, ज्यामुळे ती लवकर खराब होणार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना नोटांची अस्सलता ओळखणे सोपे जावे म्हणून सुरक्षा धागा आणि वॉटरमार्क अधिक ठळक करण्यात आले आहेत.
५०० रुपयांच्या नोटेत काय बदलणार ?

मोठ्या व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बनावट नोटा ओळखण्यासाठी सूक्ष्म छपाई अधिक तीक्ष्ण करण्यात आली आहे. नोटेचा रंग आणि डिझाइनमध्ये अधिक स्पष्टता आणली आहे. विशेष म्हणजे, सर्व एटीएम आणि रोख व्यवहार करणारी यंत्रे जुन्या आणि नवीन अशा दोन्ही नोटा स्वीकारतील, असे बँकिंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जुन्या नोटांचे काय होणार ?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटांवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तुमच्याकडे असलेल्या सध्याच्या १०० आणि ५०० च्या नोटा पूर्णपणे वैध राहतील. जुन्या नोटा चलनातून बाहेर काढण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन नोटा केवळ जुन्या नोटांच्या सोबतीने व्यवहारात येतील.



