
डोंबिवली ; प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातून सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेने शहरातील सर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना कायदेशीर नोटीसा बजावल्या असून देखील अनेक इमारतींमध्ये नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत असल्याबद्दल आयुक्त अभिनव गोयल यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महापालिकेने ‘जाहीर आवाहन’ करत सांगितले आहे की, जर नोटीस देऊनही नागरिक घर खाली करत नसतील आणि एखादी इमारत कोसळून दुर्घटना घडली, तर त्या जीवित किंवा वित्तहानीला पूर्णपणे तेथील रहिवासीच जबाबदार असतील, यात महापालिका जबाबदार नसेल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आयुक्तांकडून करण्यात येत आहे.



