
मुंबई :- प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि सातत्याने वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच १६ डब्यांची करण्यात येणार आहे. सध्या आठ डब्यांच्या संरचनेत ही गाडी धावते. परिणामी क्षमतेच्या मर्यादेमुळे अनेकदा प्रवाशांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गाडीच्या डब्यांची संख्या दुप्पट म्हणजे १६ डब्बे करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते मडगावदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरील लोकप्रिय गाड्यांपैकी एक ठरली आहे. सध्या ही गाडी केवळ आठ डब्यांसह धावत असून, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या १२ किंवा १५ डब्यांच्या रेकच्या तुलनेत तिची क्षमता कमी आहे. पर्यटन हंगाम, सुट्ट्या आणि सणांच्या काळात या गाडीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे १६ डब्यांच्या रेकमुळे एकाच फेरीत अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी बहुप्रतीक्षित दुहेरीकरण प्रकल्पालाही वेग देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून २६३ किमी लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत तीन नवीन स्थानकांची उभारणी, अतिरिक्त लूप लाइन्स, सिग्नलिंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण मालगाड्या तसेच प्रवासी गाड्यांसाठी अधिक कार्यक्षम मार्गरचना विकसित करण्यात येणार आहे. दुहेरीकरणामुळे क्राॅसिंगचा हा अडथळा दूर होऊन प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.


